अभियंता दिन (Engineers Day) साजरा करतांना…
अभियंता दिन (Engineers Day), 15 सप्टेंबर ला साजरा केला जातो आणि त्या दिवशी अनेक संदेश फेसबुक तसेच इतर समाज माध्यमातून फिरतांना दिसतात. या संदेशांची तीव्रताच दाखवून देते की आपल्या आजुबाजुला किती मोठ्या संख्येने अभियंता वर्ग आहे. आता खरा प्रश्न इथेच निर्माण होतो, खरच अभियांत्रिकी मध्ये असे काही उरले आहे का की अभियंता दिन साजरा करावा? प्रत्येक गोष्टीचा दिवस साजरा करण्याची परंपराच आपण घालून घेतली असल्यामुळे आता त्याला कोण काय म्हणणार. असो मूळ मुद्दा असा आहे, की अभियंता दिन साजरा करताना आपण खरच अभियांत्रिकी ची सद्यस्थिती डोळे उघडून बघणार आहोत का? खरच आज देखील तेच वलय अभियांत्रिकी ला आहे का? हे असे प्रश्न जो पर्यंत आपणास पडत नाही आणि आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करत नाही. तो पर्यंत आपल्या तरुण लोकसंख्येच्या खूप मोठ्या घटकाच्या मूलभूत प्रश्नाला भिडणार नाही.
अभियांत्रिकीच्या महाराष्ट्रातील Mechanical, Civil आणि Electrical च्या जवळपास 70% जागा 2019-20 साठी रिकाम्या आहेत. हे प्रमाण अजून तरी IT आणि Computer साठी 30% इतके तुलनेने कमी आहे. 2019-20 मध्ये 27 पॉलिटेक्निक आणि 3 अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्र शिक्षण विभागाने (DTE) बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. AICTE ने 2014-15 ते 2018-19 या कालावधीत संपूर्ण भारतात 410 अभियांत्रिकी महाविद्यालय बंद करण्याचे आदेश दिले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण आहे विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे टाळले आहे. आता ही परिस्थिती काही फक्त चालू वर्षातील नाही, हा प्रश्न हळू हळू मोठा होत गेला आहे.
भारतीय शिक्षण व्यवस्थेचा नीट विचार केला तर आपल्या लक्षात येते की एकविसाव्याशतकाच्या पाहिल्या दशकात प्रथम अशीच परिस्थिती D.Ed ची झाली होती 2010 नंतर अभियांत्रिकी ला या परिस्थिती ला तोंड द्यावे लागत आहे.
आज कोणतेच असे क्षेत्र राहिले नाही जिथे अभियांत्रिकी झालेले विद्यार्थी भेटणार नाहीत, अगदी स्पर्धा परीक्षा पासून तर स्टॅण्डअप कॉमेडी पर्यंत सगळ्या क्षेत्रात ही उपस्थिती जाणून येते. याचे मूळ कारण सर्वश्रुत आहे, आपल्या समाजातील मध्यम वर्गीय मानसिकता, ज्यात मुलांचा कल न बघता मुलांना एकदा अभियांत्रिकीच्या भट्टीतून काढले म्हणजे त्याचे भविष्य सुरक्षित होते ही ‘दूरदृष्टी’.
या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? याचे सरळ सोपे उत्तर देणे अशक्य आहे, कारण यामध्ये समाजातील सर्वच घटकांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला आहे. पण सर्वात महत्त्वाचा जबाबदार घटक नेहेमी प्रमाणे धोरण निर्माते आहेत. कारण काहीही मूलभूत सुविधा नसलेल्या महाविद्यालयांना मान्यता देणे, मूल्यांकन करताना योग्य प्रकारे ते न हाताळणे, अभ्यासक्रमांची कालसुसंगतता न साधणे, इत्यादी.
Aspiring Mind’s च्या 2019 मधील अभ्यासता असे निदर्शनास आले आहे की 80% अभियंते नौकरी करण्यास पात्र नाही. या मधील वेगवेगळ्या शाखा मधील माहितीचा चार्ट सोबत जोडत आहे. या मध्ये आता भविष्यात जे मनुष्यबळ बाहेर पडणार आहे त्यांना परिपक्व बनवण्यासाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जसे IOT, AI, ROBOTICS, AUTOMATION सारख्या नव्या ज्ञान शाखा मध्ये विद्यार्थ्यांना पारंगत करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांना कारखान्यांसोबत करार करणे, त्यात आपल्या प्रयोग शाळांना उत्पादन केंद्रात परावर्तीत करणे अश्या गोष्टीत आघाडी घेणे अत्यावश्यक आहे. तसेच विद्यापीठाच्या अभ्यासक्रम निर्मिती मध्ये उद्योग जगताला सोबत घेणे तसेच ठराविक काळाने अभ्यासक्रम अद्यावत करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
आधुनिक भारताच्या पायाभूत सुविधांचा जडणघडणीत अत्यंत मोलाचे योगदान असणार्या जागतिक ख्यातीचे अभियंताभारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्यायांचा जन्मदिवस हा अभियंता दिन
म्हणून साजरा करताना आपल्याला आनंद होणे साहजिकच आहे. पण त्याच सोबत समृद्ध आणि सशक्त भारताच्या निर्मिती साठी अभियांत्रिकी ला सशक्त आणि कालसुसंगत करणे आवश्यक आहे याचा विसर आपल्या पडू नये यासाठी हा खटाटोप.
Post Comment