प्रतिकार | Resistance – संघर्षाची वैचारिक मांडणी

अरे प्रश्न पडलाय पिढ्यान पिढ्या

आणि कोढ्याचं उत्तर सुटेना ह्या

अहो साहेब, अहो सरकार,,,

आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही

                                          आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या…    

        अनेक दिवस ऐकून असलेल्या आणि एकंदरीत ज्या डॉक्युमेंट्री सिरीजच्या निर्मितीची प्रक्रिया माहित असलेल्या माझ्या सारख्यासाठी डॉक्युमेंट्री सिरीजच्या ट्रेलरच्या सुरुवातीची ही आर्त हाक खूपच अचंबित करणारी आणि कुतूहल निर्माण करणारी होती. ट्रेलर बघितल्या-बघितल्या पहिला फोन अरविंदला केला आणि हे पूर्ण गाणे कुठे ऐकायला मिळेल, तसेच हे कुणी गायलंय हे पहिल्यांदा विचारले. असे का व्हावे की ज्या डॉक्युमेंट्री सिरीजची खूप प्रतीक्षा केली, तिच्या ट्रेलरमध्ये नेमके काय आहे, त्यात आपल्याला काय जाणवत आहे, हे बोलण्याऐवजी माझे पूर्ण स्वारस्य या गाण्यात गुंतून पडले होते? पिढ्यानपिढ्या कितपत पडलेल्या समाजाची ही आर्त हाक जणू दिग्दर्शक आपल्या पुढे मांडू पाहतोय असे जाणवत होते. अर्थातच ट्रेलर नंतर ‘प्रतिकार’ (रेजिस्टन्स) या डॉक्युमेंटरी सिरीज बद्दलची आणि तिच्यात सांगण्यात येणाऱ्या गोष्टी बद्दलचे कुतूहल आणखीनच वाढत गेले.

        कधी एकदा ही डॉक्युमेंट्री सिरीज बघतो असे झाले होते आणि हा योग नुकताच जुळून आला देखील, अर्थात त्यातही पहिले तीनच भाग बघता आलेत. शेवटचा भाग बघून मग यावर लिहिता येईल असे वाटत होते, परंतु आपल्याला ही डॉक्युमेंट्री बघतांना जे वाटले ते आता लिहणे खूप गरजेचे असे देखील राहून-राहून वाटायचे, म्हणुन हा लेखन प्रपंच. एखादी कलाकृती बघताना किंवा बघायला जाताना आपल्याला तिच्याकडून खूप अपेक्षा असतात, कधी-कधी तर या अपेक्षांच्या ओझ्याखाली ती कलाकृती दबून जाते, मनात अशी भीती ही डॉक्युमेंट्री बघायला जातांना होतीच. त्यामुळे होता होईल तितके अपेक्षांचे ओझे बाजूला ठेवून डॉक्युमेंट्री बघायला सुरुवात केली, आणि मग जे काही या १६५ मिनिटांत अनुभवले ते इथे मांडतोय… 

        डॉक्युमेंट्री सिरीज चार भागातील असल्याने प्रत्येक भागाबद्दल वेगवेगळे लिहिता येईल, कारण प्रत्येक भागात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिग्दर्शक सांगतांना दिसतोय. पहिला भाग प्रस्तावनेचा असल्याने भारत जोडो पर्यंतची एकंदरीत प्रस्तावना त्यात येते. अर्थात ती प्रस्तावना अगदी २०१४ च्या सत्तांतर पासूनची नाहिये, तर कोव्हिडपूर्व आणि कोव्हिडोत्तर काळातील दोन महत्त्वाच्या जनआंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आहे. ती दोन जनआंदोलने म्हणजेच सीएए-एनआरसी  विरोधी  आंदोलन आणि किसान आंदोलन, खरतर ही दोन्ही आंदोलने ढोबळमानाने समाजातील दोन वेगवेगळ्या अस्मिता समूहांनी केली, असे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न मुख्य प्रवाहातील माध्यमांतून झालाय. पण खरंच तसं आहे का? आणि थोड्या वेळासाठी ते मान्य केले, तरीही ती आंदोलने ज्या गोष्टींचा ‘प्रतिकार’ करत होती, त्यात शासकीय धोरणाचा समान धागा होताच ना. तो धागा पकडण्याचा प्रयत्न आपल्याला ‘रेझिस्टन्स’ च्या पहिल्या भागात बघायला मिळतो. अर्थात केवळ चाळीस मिनिटांत हा एवढा मोठा लढा आणि त्यामागील कारणमिमांसा मांडतांना दिग्दर्शकाची झालेली धावपळ आपल्याला बघतांना जाणवते. काही ठिकाणी मांडणी अंगावर येतेय का, की आपली आकलनाची गती कमी पडतेय, अशी शंका निर्माण होण्यास वाव आहे. परंतु तुम्हाला या दोन आंदोलनाची सामान्य पार्श्वभूमी माहित असेल, तर तुम्हाला यात जास्त काही वाटणार नाही. तसेच पहिला भाग बघतांना ही प्रस्तावना पुढे कुठे जाईल याचा विचार आपल्या मनात निर्माण व्हायला सुरुवात होते.

        या प्रस्तावनेच्या पार्श्‍वभूमीवर तुम्ही दुसरा भाग बघायला सुरूवात करता, ज्याची मुख्य थीम ही ‘वारशाच्या शोधात’ अशी आहे. नेमका कोणता वारसा आणि कशाचा वारसा शोधायचा आहे, कॉंग्रेसजन, पुरोगामी विचारांची लोक किंवा एकंदरीतच समाज म्हणून आपण आपला वारसा विसरलोय, असे दिग्दर्शकाला म्हणायचंय का? असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. या प्रश्नांच्याच धुक्यात आपला वारशाचा शोध सुरू होतो, आणि एका मागून एक धक्के खात आपण मार्गस्थ होत राहतो. हा भाग मला वैयक्तिक पातळीवर सर्वात जास्त आवडलाय, कारण हा वारशाचा शोध काय एकांगी नाहिये, त्यात काय फक्त भूतकाळाचा उदोउदो नाहिये की फक्त भूतकाळाचे रडगाणे, कदाचित यालाच दिग्दर्शकाची तटस्थता म्हणता येईल. या भागात ७५ वर्षांत देखील वंचित-उपेक्षित राहिलेल्या भटक्या आणि विमुक्तांना त्यांचे म्हणने मांडण्याचे माध्यम दिग्दर्शक होतांना दिसतोय. पडद्यावर दिसणारी ही वंचितता पिढ्यानपिढ्या सत्तेत असलेल्या कॉंग्रेसचा वारसा आहे का? असा देखील प्रश्न मनात निर्माण होतो. आणि जर आपण कॉंग्रेसला यासाठी जबाबदार धरत असलोच, तर त्या समूहांचे इंदिरा गांधींवर ओसंडून वाहत जाणारे प्रेम नेमके आपल्याला कोड्यात टाकणारे ठरते. एकाच वेळी दोन टोकांच्या भावना व्यक्त करणारे लोक, त्यांच्या बोलण्यातील हतबलता आणि इतिहासातील त्यांच्या नायिकेच्या नातवासाठीची तळमळ, तसेच त्याच्या कडून असलेल्या अपेक्षा, हे सर्व एक सारख्या तीव्रतेने प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे दिग्दर्शकास समर्थपणे साध्य करता आले आहे. कदाचित प्रश्नांचा आवाका आणि मर्यादा चांगल्या प्रकारे माहीत असल्याचे हे फलित असावे. 

       या भागात चाललेला वारशाचा शोध हा फक्त प्रश्नांत अडकत नाही, तर तो उत्तरे देखील सांगण्याचा प्रयत्न करतो. यातील स्थानिक गाणी/ओव्या हे या भागाचे विशेष आकर्षण आहे. इंदिरा गांधींच्या संदर्भात सर्वसामान्य महिलांनी गायलेल्या ओव्या/गीते आपल्याला इंदिरा गांधींकडे आजपर्यंतच्या आणीबाणी केंद्रित दृष्टीकोनातून बघण्याची मर्यादा अधोरेखित करून देतात. इंदिरा गांधींचा कार्यकाळ अनुभवलेल्या लोकांना त्यांच्याबद्दल काय वाटते, धोरणात्मक पातळीवर त्यांच्या कार्याला जाणून घेणे खरंच गरजेचे आहे, असे आपल्याला वाटण्याची दाट शक्यता आहे. दोन लोकसभा निवडणुकीत दोन अंकी खासदारांवर मर्यादित झालेली काँग्रेस तिचे सत्त्व हरवून बसली आहे का आणि ती बसलीच असेल तर तिला नेमका कोणता वारसा हवा आहे, याचे उत्तर या भागात मिळू शकते, सोबतच पुरोगामी विचारांच्या लोकांना येथून पुढ कशाची मोट बांधणे गरजेचे आहे ते देखील समजते.

        वैचारिक वारसा शोधल्या नंतर तिसर्‍या भागात डॉक्युमेंट्री सिरीज भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या शोधता मार्गस्थ होते. या भागातील मांडणी राजकीय पक्ष या संकल्पनेच्या एकंदरीत वाटचालीत दीर्घकाळ सत्तेत असलेल्या पक्षांचे काय होऊ शकते, याचा वस्तुपाठ मांडतांना दिसते. अर्थात या मांडणीला कॉंग्रेस निमित्त मात्र आहे. या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची तळमळ, त्यांची वैचारिक स्पष्टता, लोकांचे कॉंग्रेस बद्दलचे मत, भाजपच्या मतदारांना कॉंग्रेस मध्ये काय दिसते आणि लोकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली वाटचाल करणारी ‘कॉंग्रेसी व्यवस्था’ खूपच स्पष्टपणे दिसते. या भागाचे मुख्य वैशिष्ठे हे त्यात काँग्रेससाठीचा सत्तेचा मार्ग शोधण्यापेक्षा वैचारिक लढ्यात काँग्रेस कुठे आहे. तिच्या कार्यकर्त्यांना खरंच तिचा वैचारिक लढा समजला आहे का, काँग्रेस व्यवस्थेवर भारत जोडो यात्रेचा काय परिणाम झालाय आणि तो लोकांना जाणवतॊय का याबद्दल विस्तृत मांडणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हि मांडणी करताना कुठेच समोरच्याने असेच बोलावे असा दिग्दर्शकाचा अट्टहास जाणवत नाही. 

        काँग्रेस बद्दल असलेल्या तक्रारी, तिच्या संरचनेतील सरंजामीत्व, सत्तेत असतांना काँग्रेस ने पक्ष संघटनेकडे केलेले दुर्लक्ष जनतेला काँग्रेस बद्दल असलेली तळमळ आणि काँग्रेस ने स्वातंत्र्य लढ्यातून वारश्यात मिळालेले प्रश्न हाताळण्यात केलेली कुचराई अगदी स्पष्टपणे आपल्या समोर उभी राहते. पण त्याचसोबत जनतेला काँग्रेस आपलीशी का वाटेत, काँग्रेस बद्दल लोकांत काय तक्रारी आहे, लोकांना आजही काँग्रेस ला काही भविष्य आहे असे वाटते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला भारत जोडोच्या मार्गावर मिळतात, त्यामुळे प्रतिकार ही डॉक्युमेंट्री सिरीज भारतीय लोकशाही, पक्ष पद्धती आणि एकंदरीत भारत या संकल्पनेत विश्वास असलेल्या प्रत्यकाने बघितली पाहिजे. 

        कोणत्याही निवडणुकीत पराभव झाल्यावर जनतेला नाव ठेवणाऱ्या काँग्रेसी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात हि डॉक्युमेंट्री सिरीज झणझणीत अंजन घालते. तसेच भारतीय मतदारांची प्रगल्भता आणि जनतेचे प्रश्न यांची जमिनी हकीगत यातून समोर येते. वरील सर्व चर्चाच्या ही मुख्यतः डॉक्युमेंट्री सिरीज मध्ये काय आहे, या संदर्भात आहे. पण त्यापलीकडे जाऊन मांडायची पद्धत आणि मुद्दे मांडण्याची पद्धत आणि जटिल गोष्टी सुलभ करून सांगण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो का? तर याचे उत्तर नक्कीच हो असे आहे. यात महिलांच्या प्रतिक्रियांना दिलेले विस्तृत स्थान, वंचित समूहांना दिलेला वेळ हे उल्लेखनीय आणि वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. 

               याच सोबत तांत्रिक बाबींचा विचार केल्यास पार्श्वसंगीत, गाण्याची निवड, ऐतिहासिक घटना उलगडून सांगण्यासाठी वापरलेले ग्राफिक उत्तम आहे. तसेच सुरुवातीला आपल्याला यात्रेतील दृश्य बघतांना खूप आवाज आहे असे वाटू शकते, खूप गोधंळ तर नाहीये ना अशी शंका निर्माण होऊ शकते, पण आपल्या आजूबाजूला असलेल्या एकंदरीत परिस्तिथीचेच जणू ते प्रतिबिंब आहे, हे आपल्याला हळूहळू जाणवायला लागते. शेवटी काय तर पिढ्यान पिढ्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रतिकार (रेजिस्टन्स) बघितली पाहिजे आणि तिच्यावर चर्चा केली पाहिजे…

Avatar photo

विविध बाबींवर व्यक्त होण्याचा प्रत्येकाचा स्वतःचा एक आयाम असतो, अशा अनेक आयामांच्या अभिव्यक्तीतून सामाजिक चर्चा विश्व फुलत जाते. यातूनच एकंदरीत मानवी विचार विश्व बहरत जाते. पूर्वापार चालत आलेल्या अभिव्यक्तीच्या माध्यमांना, आता आधुनिकतेची किनार लाभली आहे. या आधुनिक साधनांचाच एक भाग असलेल्या, ब्लॉगच्या माध्यमातून मी दृष्टिकोन येथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तो वाचून अभिप्राय द्यायला एवढीच अपेक्षा...

Post Comment

You May Have Missed